Monday, September 21, 2009

श्रीदेवी!

श्रीदेवी!

नाही नाही मंडळी मी "नवरात्री"बद्दल बोलत नाही! खरतर मी १९-०९-२००९ च्या 'दस का दम' या कार्यक्रमाबद्दल बोलतोय! श्रीदेवी हि माझी लाडकी अभिनेत्री या कार्यक्रमात आली होती! कित्येक वर्षांनंतर तिचे दर्शन घडत होते! तिला पहायला हे दोन डोळे अपूरे पडत होते! आजही ती तितकीच सुंदर दिसते! २ मुलींची आई आहे यावर अविश्वास वाटावा इतकी ती "गोड" दिसते आजही! भराभर तिचे चित्रपट, तिची गोळा केलेली छायाचित्रे, आणि कोणी तिच्याबद्दल चांगले बोलले नाही कि त्याची केलेली "धुलाई" सगळ्या गोष्टी आठवल्या! "सदमा", "मि.इंडिया", "चांदनी", "चालबाज", "लम्हे", "नगिना", "खुदा गवाह" हे तिचे अफलातून चित्रपट! प्रत्येक भूमिका वेगळी आणि तितकीच प्रभावशाली! साक्षात अमिताभ बच्चन जिथे केवळ स्वतःच्या नावावर संपूर्ण चित्रपट तारून नेत होता, तिथे "श्रीदेवी" हि एकमेव हिरॉईन असावी जी केवळ स्वतःच्या नावावर चित्रपट यशस्वी करत होती! "चांदनी", "लम्हे" जणू काही तिच्याचसाठी बनले होते! तिच्यासोबत काम करायला मिळावे म्हणून शाहरूख खानने "आर्मी" या चित्रपटात एक छोटीशी भूमिका केली होती, यावरून तिची लोकप्रियता कळून येते!

मला आठवते, ११-१२वी मधे असेन मी, आमच्या कॉलेजमधे एक मुलगी होती, ती मुलगी या "श्रीदेवी"ची "कर्मठ" "चाहती" होती! तिच्या घरी गेलो होतो तेव्हा तिच्या या "वेडा"ची जाणीव झाली आम्हा मित्र-मंडळींना! जे श्रीदेवी करेल ते सगळे तसेच्या तसे हि करायची! कॉलेजमधे गॅदरिंगला डान्स बसवायचा तर तोही श्रीदेवीच्या गाण्यावरच! अर्थात "श्रीदेवी"चे "वेड" जगणारे काही कमी नव्हते आमच्यात! आमचा आख्खाच्या आख्खा कंपू "श्री"वेडा होता! काय तर म्हणे पानशेत धरण परिसरात शूटिंग चालू आहे, आणि त्यात "श्री" आहे! मग काय आम्ही सगळे सायकलवर पानशेतला! शूटिंग वगैरे काही नव्हते, अफवा होती ती! पण आमचा १०-१२ जणांचा कंपू सुटला पानशेतच्या दिशेने! आजही हि गोष्ट घरच्यांना माहित नाहि (आता माहित होईल)! घरी येईपर्यंत वाट लागली होती पायांची, दोन दिवस कुणीच कॉलेजला गेले नाहि!

प्रत्येकी थोडे थोडे पैसे काढून आम्ही "फिल्मफेअर" वगैरे विकत घेवून त्यातिल "श्री"चे फोटो गोळा करायचो! ते नीटपणे एका वहीत चिकटवून ठेवायचो! कित्येक वेळातर वर्तमानपत्रांतून येणा-या तिच्या चित्रपटांच्या जाहिराती मिळवण्याकरिता आम्ही रद्दीवाल्याशीसुद्धा हुज्जत घातली आहे! वर्तमानपत्राचा कागद लवकर खराब होतो म्हणून मग मेणबत्तीच्या मेणाने त्या जाहिरातीची कॉपी वहिच्या कागदावर उमटवायची आणि त्या कॉपीबरोबर ती जाहिरातही वहिला चिकटवून ठेवायची! काय वाट्टेल ते करायचो! "श्री"चा एखादा फोटो रस्त्यात पडलेला दिसला तर आम्ही तो उचलूनही घेतला आहे कितीतरी वेळा! आणि एकदा असाच उकिरडा फुंकत असताना, एका मित्राच्या आईने पाहिले आणि तिच्याकडून चांगला चोपपण खाल्ला आहे! पण आम्हीपण बिलंदर त्यानंतर त्या काकूंना आम्ही २ वर्षे कुणाही मित्राच्या घरी जाऊ दिले नाहि!(हो ना! उगाच नंतर प्रत्येक मित्राच्या आईकडून मार खावा लागला असता!)

दस का दम या कार्यक्रमात तिला पाहताना जाणवली ति तिची उत्कटता! प्रश्नाचे उत्तर पाहताना तिच्या चेहर्‍यावरचे बदलणारे हावभाव! तिला हळूच "मुह बंद रखो" असे समजवणारा तिचा नवरा बॉनी कपूर! हे सगळेच अफलातून होते!

जसे जसे "श्री"चे दर्शन कमी होत गेले तसे तसे मग तिचे "वेड" पण ओसरू लागले! आम्हीपण वयाने मोठे होऊ लागलो होतो! कितीहि मोठी उडी मारली तरी आपण चंद्राला नाही हात लावू शकणार हे कळायला लागले! मग मित्रपरिवार विरळ झाला, जो तो आपापल्या "करिअर"च्या मागे लागला! त्या वह्या ज्यात "श्री"चे फोटो होते, काळाच्या ओघात कुणाकडे गेल्या हेही आता नाहि आठवत! इतकच काय, पण आता ०८/०९/१०/११/१२वी मधे जे मित्र होते त्यांच्याशी असलेला संपर्कही फार पातळ झाला! पण आमच्या मनांत "श्री"ची जागा घेणारी एकही हिरॉईन आली नाही!

जेव्हा "दस का दम" पाहिले, तेव्हा या सगळ्या गोष्टी परत आठवल्या! या कार्यक्रमातील तिची छबी केवळ डोळ्यातच नाहि तर लॅपटॉपवरपण साठवून ठेवली! लॅपटॉपवरचा साधा वॉलपेपर बदलून तिचाच फोटो लावला! आणि मनापासून म्हटले, " 'श्री' वी मिस यू!!!"


हिमांशु डबीर
२१-सप्टेंबर-२००९

Saturday, September 5, 2009

दान

"दान"

परवा वर्तमानपत्रांतून बातम्या वाचल्या, मिरज गावात उभारलेल्या "अफजल वधाच्या" देखाव्यांवरून म्हणे आपले मुसलमान बांधव पेटून उठले! दगडफेक, जाळपोळ, मारामार्‍या, दंगल यांसारख्या मग 'सोयीस्कर' आणि नित्यनेमाच्या गोष्टी कशा अगदी निरलसपणे पार पडल्या! शूरवीर पोलिसांनी मग अश्रूधूराच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवण्याचे काम किरकोळीत केले! आपल्या देशात असे राजरोसपणे चालू असते मग का लक्ष द्या या गोष्टीकडे? पण नाही, हिच प्रवृत्ती घातक ठरत आहे आपल्याला! आपले अलिप्त राहणे हे आजच्या समाजकारण्यांचे आणि राजकारण्यांचे बालेकिल्ले बनले आहेत! त्यांना जाब विचारणे तर दूर, त्यांच्यामागे आपण आंधळ्यासारखे चालत राहतो! आणि काळ सोकावतो!

शिवरायांनी स्वराज्य उभारले ते काही 'हिंदू' राज्य म्हणून नाही, तर एक "हिंदवी स्वराज्य" म्हणून! केवळ "हिंदूंचा" राजा म्हणवून घ्यायला नाहि तर पीडित समाजाला न्याय मिळवून द्यायला आणि अन्याया विरुध्द आवाज उठवून प्रसंगी छातीठोकपणे आपल्या हक्कासाठी लढायला शिकवले त्यांनी! आणि यांच प्रयत्नांतून स्वराज्य निर्माण झाले! राजांनी अफजलचा वध केला, हत्या नाही! हत्या आणि वध या दोहोंत फार मोठा फरक आहे! सुरत जेव्हा शिवरायांनी लुटली तेव्हा इनायतखानाने त्यांच्या शिबिरात आपला माणूस पाठवला तो शिवरायांची हत्या करायला, वध करायला नव्हे! अफजल मारला गेला तो उघड उघड भेटीत! त्याच्या कपटाला राजांनी "जशास तसे" उत्तर दिले! पण राजांनी अफजलचा वध केला तो काही तो मुसलमान होता म्हणून नाही तर तो त्यावेळी समाजाला घातक होता म्हणून! त्याने देवळे तोडली, माणसे बाटवली, स्त्री नासवली, त्या नरधमास रोखणे आणि पर्यायाने त्याचा वध करणे अनिवार्य होते म्हणून!

कुठला धर्म शिकवतो कि दुसर्‍या धर्माचा माणसाला जगण्याचा अधिकार नाही म्हणून? त्यांचा खातमा करा म्हणून कोणता धर्म सांगतो? मला तरी नाहि वाटत कुठला धर्म असे सांगत असेल म्हणून!

तरी आजहि आपल्या देशात त्या अफजलच्या थडग्याची नित्यनेमाने पूजा होते! आपल्या देशाचा पंतप्रधान बेंबीच्या देठापासून कोकालून सांगतो, कि या देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे म्हणून! का हा देश हिंदुचा नाही??? सर्वांना समान अधिकार असायलाच हवा ना! हिंदु म्हणून जन्मलो हा काय गुन्हा झाला का?

आणि एवढे सगळे असूनही माझा मुसलमान बांधव ओरडतोच आहे अजुन सुविधा द्या म्हणून! आणि आपले राजकारणीसुद्धा त्यांचे लांगुलचालन करत आहेत! दिले होते ना ५५ कोटी, मग का नाहि गेलात त्या देशात? आता राहिला आहात ना भारतात तर भारतीय म्हणून जगा! जरा काही खुट्ट झाले कि लगेच उठले हे मारायला, का तर म्हणे यांचा इस्लाम खतर्‍यात आहे! अरे माझ्या बांधवांनो, तुमचा इस्लाम का एवढा कमकुवत आहे का? तुमच्या धर्मात सहिष्णूता नाही का? तुमच्याच एका महान संताने १९व्या शतकाच्या सुरवातीला सांगितले होते ते विसरलात का? त्या महान संताचे नाव होते "मेहताबशा"! काय म्हणाले होते ते? ते म्हणाले होते, "सामान देउळ, मशिदिचे| एकची आहे साचे| आकाराने भिन्नत्व त्याचे| मानून भांडू नये हो!" पुढे ते काय म्हणतात, "खुळे देउळ मशिदीची| तुम्ही नका वाढवू साची| ती वाढता दोघांची| आहे हानि होणार|" पुढे ते काय म्हणतात ते फार महत्वाचे आहे. ते म्हणतात, "यवन तेवढा खुदाचा| हिंदु काय भुताचा? पोक्त विचार करा याचा| मनुष्यपण टिकवावया!"

माझ्या बांधवांनो, जरा विचार करा, जोपर्यंत आपण असे जाती-धर्मावरून आपसांतच लढत राहू तोवर आपल्याला मुंबई १९९३, मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट मालिका, मुंबई २६/११, दिल्ली बॉम्बस्फोट, आणि या सगळ्यांत शरमेची बाब म्हणजे आपल्या संसदेवर झालेला हल्ला! संसद हल्ल्याच्या आरोपीला आपण अजूनही पोसतो आहोत! कसाब ज्याने सगळ्या जगा समोर आपल्या देशबांधवांना मारले त्याच्यावर आपण इमाने-इतबारे खटला चालवून त्याच्यावर पैसा नाहक खर्च करतच आहोत! आधी आपण सगळे भारतीय आहोत, नंतर आपल्या धर्माचे! हे आपल्याला कधी कळणार!

आज कोणी एक काही तरी बोलतो आणि आपण लगेच लागतो भांडायला! अक्कल गहाण ठेवली आहे का आपण? माणसे आहोत कि जनावरांच्या झुंडी आहोत आपण? निवडणूकांच्या तोंडावर या गोष्टी घडतात, तेव्हा दंगलीमधे दगडफेक करायच्या आधी तुमच्या डोक्यात हा विचारही येत नाहि का, कि आपण हे का करतोय? काही दुसरे विधायक उद्योग नाहीत का आपल्याला? जाळपोळ करायची, देशाची हानी करायची हि कसली रानटीवृत्ती? यापेक्षा देशासाठी तुम्ही काय करणार, आणि नाही केले तर काय हे प्रश्न विचाराना त्या निवडणुकीत मत मागयला आलेल्या उमेदवारांना! ते नाही जमणार!

विचार करा जरा, लोकसभा मतदान झाले त्यात किती मतदान झाले? ५०% पेक्षा कमी! म्हणजे ५०% अधिक जनतेला असे वाटते कि आजचे राजकारणी राज्य चालवायच्या लायकीचे नाही! पण ज्यांनी मतदान केले त्यातून हे आले निवडून! साधी भाजी घेताना आपण पारखून घेतो, तर मग ज्याच्या हाती आपण आपल्या देशाची सत्ता सोपवतो त्यांची पारख आपण काय एक दारूची बाटली आणि एका १०० रुपयांच्या नोटेवर करणार? कधी येणार अक्कल?

मत न देण्याचा अधिकार आहे आपल्याला! बजवावा कि तो! त्याला सुध्दा मोठि किंमत आहे! पण ते नाही जमणार तुम्हाला, कारण मत न देण्याचा अधिकार बजावलात तुम्ही तर तुम्हाला कोणी बाटली नाही देणार, ना कोणी नोट देणार! मग काय तुम्ही नेहेमीप्रमाणे आंधळ्यासारखे मत"दान" करणार! पण मित्रहो, "दान" या शब्दाचा अर्थ काय, परतीची अपेक्षा न करता जे दिले जाते ते "दान"! पण तुम्ही तर या पवित्र शब्दाचा अर्थच बाटवला आहे!

जास्त काय लिहू! सुज्ञांस सांगणे न लगे! या मतदानावेळी जर परत नेहेमी प्रमाणे घडले तर एक गोष्ट नक्की म्हणावीशी वाटेल "जनतेला अक्कल नसते!"


हिमांशु डबीर
०५-सप्टेंबर-२००९