Wednesday, December 12, 2012

आंबा आणि आजोबा भाग - २

आठवणींच्या हिंदोळ्यात आजोबा अलवारपणे झोपी गेले होते...

पुढे चालू...

गण्याने पाहिले कि आजोबा झोपले आहेत, अगदी निरागस बालकासारखे! त्याला आजोबांना जागे करायची इच्छा होत नव्हती, पण पाने खोळंबली होती! त्याने आजोबांना हाक मारून जागे केले. आजोबाही जेवायला आले! केळीच्या पानावरचा तो वाफाळलेला भात त्यावर मुगाचे वरण आणि साजूक तुपाची धार! प्रसन्न वातावरणात आजोबांचे जेवण सुरू झाले! तांदळाची भाकरी, गरमागरम कुळीथाचे पिठले! 'क्या बात है!' आजोबा नकळत दाद देऊन गेले! उकडीचे मोदक, बिरड्याची उसळ असा तो आवडीचा बेत खाऊन आजोबांचा आत्माराम शांत झाला! रोज टेबल-खुर्ची वर बसून मोजकेच जेवणारे आजोबा आज तृप्त झाले! घरच्या लक्ष्मीला मनोमन वंदून आजोबा उठले. गण्याने वाडीतील ओली सुपारी दिली. पाय मोकळे करण्यासाठी आजोबा वाडीत गेले. छोटीशीच वाडी ती, पण केळी, सुपारी, आंबा, जायफळ, नागवेलींनी हिरवीगार दिसत होती. सुपारी चघळत चघळत आजोबा आंब्याच्या सावलीत बसले. त्या गर्द आमराईत माथ्यावर आलेल सुर्य सुद्धा शितल भासत होता.

आंब्याचा मोहोर टपकन आजोबांच्या अंगावर पडला तसे आजोबांनी वर पाहिले आणि त्यांना भासले कि जणू तेच मोहोरले आहेत!

त्यांच्याच नकळत त्यांचा त्या आंब्याशी संवाद सुरू झाला -

'काय आजोबा कसे आहात? बरे वाटते आहे ना!' त्या प्रश्नांनी आजोबांना जिवलग भेटल्याचे वाटले. त्यांचा श्वास भरून आला, हसून त्यांनी झाडाकडे पाहिले!

'बघा आजोबा, मला आता छान मोहोर लागायला सुरूवात झाली आहे! थंडी वाढली की मोहोर वाढतच जाणार आणि मी देखील बहरत जाणार! पक्ष्यांची किलबिल वाढणार अन् वा-यावर डुलणा-या कै-यांचा भार पेलण्यात मी दंगून जाणार! मजाच मजा असते आजोबा!'

आजोबा बोलले - 'खरं आहे बाबा तुझं, भाग्यवान आहेस! दरवर्षी मोहोरतोस! आंब्याने लगडतोस, पन्हे देऊन शांत करतोस, रसाने तृप्त करतोस अन् जीभेवर रेंगाळणारी लोणच्याची चव देतोस! फळांच्या राजाचा राजवाडाच तू!

आजोबा थोडे स्तब्ध झाले, मनात शोधू लागले की आपण कधी असे मोहोरलो होतो? आंब्याला ते म्हणाले, 'अरे तुला माहित नसेल पण मला अगदी स्पष्ट आठवते... मी देखिल आयुष्यभर असाच बहरत होतो.. आईच्या उदरात वाढत होतो, संस्काराने वृध्दिंगत होतो, सवंगड्यांबरोबर बागडत होतो, भांडत होतो, करियरची वाट शोधत होतो. यशापयशाची गोडी चाखत होतो. आई-वडिलांच्या भक्कम आधारावर नोकरी व्यवसायात स्थिर होत होतो.

बघता बघता लग्नाच्या बेडीत धुंद होत होतो! इटुकल्या सोनपावलांनी आलेल्या पिल्लांचा पसारा वाढवत होतो, त्यांच्या वाढीत बहरत होतो. सुख-दु:खाच्या क्षणांत मोहरत होतो. वा-याशी स्पर्धा करताना जीवनसाथीच्या बरोबरीने धावत होतो. क्षणाची उसंत न घेता हर क्षण साथ देणारी, मुलांना मायेने धाकात ठेवणारी, सुसंकृत सहचारिणी लाभल्याने भाग्य अधिकच बहरले होते. मुले, सुना, नातवंडे यांच्या गोकुळात मी जरा हटकेच होतो.

गुरू माउलींकडून ध्वनित झालेला, सप्त सुरांतून प्रकटणारा ओंकार नाद ब्रम्ह आता खुणावत होता. सुखांच्या तृप्तीने आनंदून पाऊले गोकूळातून वैराग्याच्या प्रांतात जाऊ पाहात होती. 'नित्य नवी प्रभा' - येणारा प्रत्येक दिवसाचा सूर्य प्रकाशाच्या कणाकणाने सारे जग प्रकाशमान करणारा - गुरूमाऊलींच्या शब्दा-शब्दांचा अर्थ जाणून घेण्याची एक अनामिक ओढ आहे...'

एक दीर्घ श्वास घेऊन आजोबा पुढे म्हणाले, 'आता बहरण्याचा, मोहरण्याचा ओघ जरासा कमी झाला असला तरी बहरणे, मोहोरणे थांबलेले नाही! तुझ्या सावलीत थोडासा विसावलो आहे रे! तुझ्या रूपाने जणू जीवा-भावाचा मैतर अचानक सामोरा आला, तृप्ती अन् समाधानाची बरसात करून गेला!'

'बघ ना तू दरवर्षी बहरतोस, सा-यांना तृप्त करताना तूही तृप्त होतोस! सा-यांनी चाखलेल्या आंब्याच्या चवींनी तू समाधानाची गोडी चाखतोस! सगळ्यांना आनंद देवून परत बहरण्यासाठी तू मोकळा होतोस! मीही असाच वर्षा-वर्षांनी, प्रसंगानुरूप क होईना मोहरतच राहिलो आणि बहरणा-या वंशाला सावली देत तृप्त होत राहिलो...'

'आजोबा...' आंब्याने साद घातली... 'खरयं हे मोहोरणे अन् बहरणे आणि परत परत मोहोरणे हाच कदाचित आपल्या आयुष्याचा अर्थ असावा!'

असा हा मनस्वी संवाद गण्याच्या हाकेने भंगला! सूर्यदेव लांटांमागून निरोप घेत होते. गण्या बोलला, 'आजोबा, आपल्या मुलांची गाडी आली आहे!'.

गण्याचे वाक्य संपायच्या आतच... आजोबा शहारले! नातवंडांचा लडिवाळ वेढा त्यांच्या कमरेला पडला, आजोबा आज परत बहरले, आजोबांनी आंब्याकडे पाहिले, तोही जणू त्या प्रसंगाने सुखावला होता! आजोबांनाही जीवनाचा आनंद उमगला होता!

गण्याला निरोप देता देता त्यांनी आंब्याची निरोप घेतला!

आजोबा आज नव्याने सीमोल्लंघन करीत होते! आणि आंबा पुन्हा बहरत होता!

समाप्त!

यशवंत डबीर
१२-१२-१२

Monday, December 10, 2012

आंबा आणि आजोबा भाग - १

माझ्या बाबांनी लिहिलेली हि एक गोष्ट...

 आंबा आणि आजोबा भाग - १


विजया दशमीसाठी आजोबा कोकणातल्या गावी जाण्यास निघाले होते. कोकणची लाल माती त्यांना खुणावत होती. समुद्राच्या भरती-ओहोटींच्या लाटा आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत होत्या. नोकरी व्यवसायात पुर्णपणे झोकून दिल्यावर आठवणींचा एक कप्पा बंद झाला होता. आपण किती वर्षांपूर्वी को़कणातल्या गावी गेलो होतो ते आठवणे आजोबांना थोडेसे जड झाले होते!

मुलांनी ड्रायव्हर आणि गाडीची सोय केली होती. पण ऐकतील ते आजोबा कसले! एकटयाने प्रवास करायचा होता. नेहमीची लाल टपाची एस्.टी. बस आता 'परिवर्तन' झाली होती म्हणे! रातराणीचा २ बाय २ चा प्रवास अनुभवायचा होता. शिवाय जेष्ठ-नागरीकांचा सवलीताचा आनंद लुटायचा होता. मनासारखा चार-चौघांसारखा प्रवास करायचा होता. बरेच दिवसांनी एकटेपणाची मुशाफिरी करायची होती. 'अरे माझी काळजी करू नका' आजोबांनी मुलांची समजूत काढून त्यांना "बाय बाय" केला! बसमध्ये अगदी 'विंडो सीट' मिळाली होती. खिडकीवर मान टेकवून गार हवेचा आनंद आजोबा घेत होते!

बघता बघता बस शहराच्या बाहेरपडून गोवा महामर्गावर आली. पनवेल-पेण-मानगाव वरून बस धूराळा उडवीत कोकणातल्या लाल मातीच्या रस्त्याला लागली होती. अजूनही रस्ता तसा अरूंदच होता पण सडक आता पक्की झाली होती. रात्री कोकणातल्या गावांत तशीच निरव शांतता होती. दिव्याची सोय असल्याने गाव आल्याचे समजत होते. रस्त्यावर एकेरी वाहतूक वाहक-चालक ह्यांना परिचयाची होती. बघता बघता बस डोंगर माथ्यावर आली. घाट ओलांडला की दोन-अडिच तासांत आजोबांचे गाव येणार होते! थोड्याच वेळात कोकणातल्या वाड्या-वस्त्यांत शिरून बस मुक्कामाला पोहोचणार होती. एका अनामिक ओढीने आजोबा प्रवासाचा आनंद घेत होते.

गाडी सुसाटतच होती. वेगाची नशा जरा जास्तच वाटत होती. आजोबांना या नशेची देखिल भीति वाटू लागली. सहप्रवासी देखिल जागे झाले होते. नकळत सा-यांचे हात आपापल्या कुलदैवताला जोडले गेले होते!
ड्रायव्हर-कंडक्टर यांनी आपला अनुभव पणाला लावला होता. कंडक्टर प्रवाशांना धीर देत होता. सर्वांच्या काळजाचा ठोका चुकलाच! एका वळणावर बस कशीतरी खड्डा आणि भिंत ह्यांत अडकून थांबली. 'गियर बॉक्स' जाम झाली! ड्रायव्हरने एका दमात सांगून टाकले! अपघाताची तीव्रता आणि प्रवाशांचे दडपण कमी केले. सारे प्रवासी स्वत:ला आणि इतरांना धीर देत बस मधून उतरले.

स्वतःच्या जीवापेक्षा काही प्रिय नसते ते अशा प्रसंगी  उमगते! झोळी खांद्याला लटकवून ओजाबा खाली उतरले! ड्रायव्हर-कंडक्टरचे आभार मानले!

सर्वत्र अंधार होता. आकाशात तारे आणि जमिनीवर दूरवरचे वाड्यां-वस्त्यांतील दिवे लुकलुकत होते. मोबाईलच्या प्रकाशात स्वत:ला आणि सहप्रवाशाला सारे न्याहाळत होते. जीव वाचला ह्या नादात किरकोळ खरचटणे सारेजण विसरले होते. मोबाईलवरून संपर्क साधण्याचे प्रयत्न चालू होते, रेंजा थोडा अडथळा होताच. ब-याच वेळाने दोन दिवे लुकलुकत येऊन थांबले. परिवर्तन बस बघून सा-यांना आनंद वाटला. ड्रायव्हर कंडक्टरची चर्चा सुरू झाली. तंबाखूचा बार भरला गेला. घाई-घाईने जमतील तेवढे प्रवासी आणि अपघाताची बातमी घेऊन परिवर्तन बस निघून गेली! आजोबा, सहप्रवासी ड्रायव्हर-कंडक्टरसह रस्त्याच्या कडेला शिळोप्याच्या गप्पा करत बसले! रातकिड्यांचे संगीत चालू होते. काजव्यांचा प्रकाश आजोबा खूप दिवसांनी परत अनुभवत होता. हाच प्रकाश सा-यांना आधार देत होता!

गप्पांच्या ओघांत नकळतच उमगले कि आता फटफटले होते! रातकिड्यांचे संगित भैरवीतून प्रसवू लागले. काजव्यांनी त्या ज्योतिर्मयाला मुजरा घातला आणि त्याचा निरोप मागितला! रस्ता आणि आजूबाजूचा परिसर थोडा स्पष्ट झाल्यावर आजोबांनी झोळी उचलली आणि सा-यांचे आभार मानले आणि गावाच्या दिशेने चालावयला सुरूवात केली. दिड-दोन किलोमीटर्सवर आजोबा एका वाडीवर पोचले, जाग दिसत होती. आजचा मॉर्निंग वॉक भन्नाटच होता! वाडीपाशी पोचल्यावर आजोबांनी खास कोकणी शैलीत साद घातली, तसाच प्रतिसाद आला आणि लगोलग एक माणूस देखिल आला! "बसा आजोबा - पाणी घ्या!" गण्याने पितळी तांब्या-भांडे आजोबांच्या हाती ठेवता ठेवता अलगद आजोबांच्या झोळिचा भार आपल्याकडे घेतला! खूप दिवसांनी गार गार पाण्याने आजोबांनी मुखप्रक्षालन केले! ते थंडगार पाणी पोटात साठवले. चेह-याला थंड पाण्याने स्वच्छ केले! हुशारी आली त्यांना!

इकडे कशी वाट धरली आजोबा? गण्याने विचारले, आजोबांनी एक दिर्घ श्वास घेतला आणि सारा प्रसंग गण्याला थोडक्यात सांगितला. आतून आलेला चहा गण्याने आजोबांना दिला, आणि म्हटले 'आजोबा... चहा घ्या नि मग गरम गरम पाण्याने स्नान करून घ्या! दुपारचे इथेच जेवून घ्या न् मग बघू पुढच्या प्रवासाचे!' गण्याचा आग्रह आजोबांना मोडवला नाही. मस्त गरमागरम पोह्यांचा नाष्टा करून आजोबांनी मुलांना संपर्क केला आणि गण्याकडे सुखरूप असल्याचे वर्तमान कळविले.
आजोबा ओसरीवर जरासे पहूडले. समोरच्या शाळेत मुले येऊ लागली. शाळा मास्तर आल्याची घंटा वाजली. प्रार्थना सुरू झाली आणि अलवार झालेले आजोबांचे मन आठवणींच्या माध्यमातून शाळेत जाऊन बसले. शाळेतील आठवणींचा पट उलगडत होता. आजोबा कविता म्हणू लागले -

चिमी-चिंगी शाळेत आली,
गोट्या-छोट्या अन् बंड्यादेखिल आली
उंदिरमामावर बसून गणपती आले
श्रीगणेशा अभ्यासाचा करून गेले
हातावर मोदक ठेवून गेले
मोरावर बसून सरस्वती आली,
ग, म, भ, न शिकवून गेली
बुध्दीची खिरापत वाटून गेली!
सिंहावर बसून दुर्गा आली
ज्युडो, कराटे शिकवून गेली!
हत्तीवर बसून लक्ष्मी आली
सोन्या-चांदिची महती वदली!
पेढे-बर्फी वाटून गेली!
बघता बघता शाळा सुटली...
चिंगी-चिमी घरा गेली!

शाळेच्या आठवणीत रमलेले आजोबा, बालपणच्या रम्यकाळाच्या झुल्यावर अनवटपणे झुलत होते! वर्गाची ती कौलारू खोली, पावसाळ्यात टप-टप गळणारे पाणी.. ते चुकवत शिकवणा-या मास्तरांची कसरत, चिखलाने भरलेले हात - पाय, डोक्यावरची पांढरी टोपी अन् घसरणारी चड्डी सांभाळत दंगा करण्याची ती अवीट गोडी.. या सा-या आठवणी त्यांच्या मनात रुंजी घालत होत्या!

क्रमशः
यशवंत डबीर