Friday, March 20, 2009

मनस्वीता - एक जिवंत अनुभव

"मनस्वीता" म्हणजे काय हे ज्या प्रसंगाने मला शिकवले, तो माझ्या जीवनातला सत्य-प्रसंग आज मी इथे मांडत आहे

२००७ मधील धुलीवंदनाचा दिवस होता तो! माझ्या सम्पुर्ण जीवनात मी तो दिवस कधीही विसरणार नाही. कौस्तुभ आणि मी कानिफनाथांच्या गुहेला भेट देण्याचे ठरविले. तसा माझा आणि कानिफनाथांच्या गुहेचा संबंध खूप पुर्वी पासून येत होता. पण कधीही या गुहेला भेट देण्याचा योग आला नाही. मला जेव्हा पासून आठवते तेव्हापासून म्हणजे साधारणतः वयाच्या ८ व्या वर्षापासून मी आई-बाबांबरोबर जेजुरीला जातो तेव्हापासून या गुहेचे मला खूप आकर्षण वाटत आले आहे. इथे जाणे खूप कठीण आहे, इथे आत जाण्यासाठी एक अगदी छोटिशी खिडकी आहे आणि त्या खिडकीतून आत जायला खूप कष्ट पडतात म्हणे! सरते शेवटी २००७ साली मित्राबरोबर इथे जाण्याचा योग जुळून आला.
दिवे घाटाच्या पुण्याकडील पायथ्याकडून एक रस्ता जातो इतकेच ज्ञान आम्हाला होते आणि नंतर समजले की पुण्यातून कोंढवा गावातून बापदेव घाटातून सुद्धा एक रस्ता जातो तो थेट कानिफनाथांच्या मंदिरात जातो. आणि हा रस्ता पुढे थेट सासवडमधे पण जातो.
तर अशाप्रकारे धुलवडीच्या दिवशी आमची स्वारी कानिफनाथांच्या गुहेकडे निघाली. दिवेघाटाच्या अलीकडून उजवीकडे एक रस्ता जातो, तो थेट कानिफनाथांच्या मंदिराच्या डोंगराच्या पायथ्याला जाऊन भिडतो. डोंगर पायथ्याला बाईक लावून आम्ही तो डोंगर चढायला सुरूवात केली. तसा डोंगर पिटुकलाच आहे, पण त्याने आमचा घाम काढला. निवडुंगाची खूप झाडी आहे इथे, काही ठिकाणी तर जाळीच आहे! त्याजाळीत फोटो काढले, आणि रमत-गमत जवळपास ५० मिनिटांमध्ये आम्ही डोंगरमाथ्यावर पोचलो. मंदिर परिसरात येतानाच एक भव्य असे नवनाथांचे भित्ती चित्र आपल्याला सामोरे येते. त्या भित्ती चित्राच्या समोर उभे असताना आपल्या उजव्याबाजूला श्री दत्त्तात्रेयांचे सुबक आणि मनमोहक मंदिर आहे, त्या देवालयातील दत्तगुरूंची मुर्ति खूप प्रसन्न आहे आणि त्या दर्शनाने आपले मन खूप सुखावते.
या मंदिराच्या समोरच कानिफनाथांच्या गुहेकडे जाणा-या पाय-या आहेत. या पाय-यांच्या बाजूने श्री ज्ञानेश्वर माउलींची मुर्ती आहे, गणपतिची मुर्ती आहे, तसेच अजून काही देवदिकांच्या मुर्ती आहेत. त्याच कमानीवर कानिफनाथ महाराजांच्या जन्माचे चित्र रेखाटलेले आहे. कानिफनाथ हे एका हत्तीच्या कानात जन्माला आले, कानात जन्मले म्हणून "कानिफा".

अंगावर येत जाणा-या पाय-यांची चढण संपवून आपण गुहेच्या प्रवेशद्वारासमोर येऊन ठेपतो. आता प्रवेशद्वार म्हट्ले की एक भव्य दिव्य असे काहीसे समोर येते ना, पण थांबा, हे प्रवेशद्वार किती मोठे आहे हे जाणून घ्यायचे आहे? ८ इंच बाय १२ इंच!!!! होय, इतकेसे आहे हे प्रवेशद्वार!!! या द्वारातूनच आत जावे लागते तर कानिफनाथांच्या गुहेत आपण पोचू शकतो. आणि आत मध्ये हि गुहा कमीतकमी १२-१५ माणसांना सामावून घेवू शकते!

आम्ही तिथे पोचलो तेव्हा एक बुवा कुठल्या तरी श्लोकाचे निरुपण सांगत होते. काही भक्तजन ते ऐकत होते, एक पुजारीबाबा त्या पिटुकल्या दारापाशी बसलेले होते आणि काहि मंडळी गुहेच्या प्रवेशद्वारापाशी खोळंबली होती. गुहेच्या आत असणारी मंडळी बाहेर आली की हि मंडळी आत जाणार होती. मी आणि माझा मित्र ते सगळे पाहत होतो. आणि आत जायचे का? यावर बोलत होतो. आता इथवर आलोच आहोत तर जाऊच आत असे ठरविले आणि तयारीला लागलो.

या गुहेत जाण्याचे काही नियम आहेतः

१. स्त्रियांना गुहेच्या आत प्रवेश नाही

२. गुहेच्या आत जाताना, शर्ट, बनियान, कमरेचा पट्टा, पाकिट, घड्याळ आदि चीजवस्तू उतरवून ठेवाव्या लागतात.

३. आधी हात, मग डोके, मग धड आणि मग पाय या क्रमानेच तुम्हाला गुहेत प्रवेश करावा लागतो

४. बाहेर पडताना वरचा क्रम उलटा करुन बाहेर यावे लागते

एकंदर तो प्रकार जरासा भीतिदायक वाटतो. आणि त्या प्रवेशद्वाराच्यावर एक वाक्य लिहिलेले आहे, "ज्याच्या उरी असे श्रद्धा त्यासी दिसे हा कानिफा". मनाची तयारी केली आणि गुहेच्या तोंडावर जाऊन उभे राहिलो, आतील लोक बाहेर आले की आम्ही आत जाणार होतो. आणि तो क्षण आला, जेव्हा मी त्या गुहेत प्रवेश करायला सिद्ध झालो.

हातात एक हार आणि काही फुले होती देवाला वाहायला घेतली होती ती. आत प्रवेश करताना, नियमाप्रमाणे योग्यक्रमाने मी आत जाण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि हात गुहेच्या आत, मधल्या चिंचोळ्या जागेत धड आणि मागे गुहेच्या बाहेर पाय अशा विचित्र अवस्थेत अडकून पडलो. आणि काही झणातच धीर सुटायला सुरुवात झाली. असे वाटू लागले की बस्स इथेच आपला शेवट!! मग सुरु झाली ती जगण्यासाठीची तडफड! आत गुहेत एकही खिडकी नाही की जिथून हवा आत येईल, पाठीमागे सगळी जागा माझ्याच देहाने अडवलेली, आता थोड्या वेळाने हवा बंद होणार आणि आपण गुदमरणार अशी भीति मनाला सतावू लागली! किती विसंगती आहे ना, समोर सक्षात परमेश्वर असताना मी मृत्युच्या भीतिने स्वतःला पछाडून घेत होतो. मग तिथेच देवाबरोबर संवाद सुरू केला, त्याला म्हट्ले, कदाचित मी अजून तुमच्या दर्शनासाठी पात्र नाही, माझी लायकी इथवरच आहे, आता मात्र मला तुम्ही परत पाठवा! तुम्हांकरता आणलेली ही फुले आणि हा हार मी तुम्हाला इथूनच अर्पण करतो, त्याचा स्वीकार करा आणि मला निरोप द्या! मान खाली झुकवली आणि एकच क्षण त्याचे ध्यान केले आणि माझे जे करायचे ते आता तूच कर, असे म्हणून त्याला संपुर्णपणे शरण गेलो आणि तो हार त्यांच्या पादुकांकडे सरकवण्यासाठी हात जितका लांब करता आला तितका केला. त्याचवेळी मागच्या पुजा-याने मला धक्का दिला आणि माझा हात थेट पादुकांवर जावून भिडला! ही सगळी घटना केवळ २५-३० सेकंद घडत असेल, माझे अडकणे, परमेश्वराशी बोलणे, त्याला शरण जाणे आणि नेमका त्याचवेळी त्या पुजा-याने मला धक्का देणे आणि ज्या कारणाकरीता आलो त्या गुहेच्या आत मध्ये मी असणे, सारेच कल्पनातीत होते! आत आल्यावर पादुकांना हार, फुले वाहिली, प्रदक्षिणा केली आणि मग ध्यान लावून नामस्मरण सुरु केले. नामस्मरण चालू असताना, एकदम एक हळूवार संवाद कानावर येऊ लागला,
"बाळा, समोर मी असा बसलेलो असताना, तुला भय कसले वाटत होते?, माझ्यावर विश्वास नव्हता का?"
बस्स इतकेच ऐकू आले आणि विचारांची श्रुंखला सुरु झाली. खरच हा परमेश्वर असा इथे असताना, त्याच्यावर सगळे सोपवून त्याला शरण जाण्याचे सोडून मीच माझी व्यर्थ धडपड करीत होतो की मी आत कसा येवू आणि जेव्हा समजले, की आत येता येत नाही तेव्हा बाहेर कसा जावू याची काळजी करत बसलो! सगळ्या जगाची काळजी घेणारा माझ्यापासून केवळ १ फुट अंतरावर होता, त्याला मी पाहातच नव्हतो! "स्वतःच्या अहंकारात होतो, की मी इथे अडकूच कसा शकतो?" सदैव हाच विचार की "मी यातून कसा बाहेर पडू?" सगळीकडे फक्त "मी, मी आणि मी"...

विचार आला, की नेमक्या त्याचवेळी जेव्हा मी त्या परमेश्वरी शक्तिला पूर्णपणे शरण गेलो, त्याचवेळी त्या पुज-याला कशी प्रेरणा मिळावी आणि त्याने मला आत ढकलावे? त्या आधी का नाही? केवळ तो हार देवापर्यंत पोचावा म्हणून लांब केलेला हात थेट पादुकांपर्यंत कसा पोचावा? आणि आत मधे पोचल्यावर मला तो आवाज का यावा? या प्रश्नांची उत्तरे मला तिथेच मिळाली. देव सतत तुमच्या बरोबर असतोच, तुम्ही त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करतच नाहीत, केवळ संकटातच त्याची आठवण येते, आणि तो जी मदत करतो, ती मदतसुद्धा आपण ओळखू शकत नाही! आपण फक्त म्हणतो ही परिस्थिती का आणलीस माझ्यावर? पण जर त्याने ही परिस्थिती आणलीच आहे तर तोच या परिस्थितीतून बाहेर पडायला आपल्याला सहाय्य करतोच करतो! आपण फक्त त्याला संपूर्ण शरण जायचे, सगळे काही त्याच्यावर सोपवायचे आणि त्याचे चिंतन करायचे!

लोक म्हणतात देव कधी दिसतो का कुणाला? देव कधी बोलतो का कुणाशी? देवाचा स्पर्श होतो का कधी कुणाला?, उत्तर आहे, हो देव दिसतो अगदी सगळ्यांना दिसतो, तो आपल्याशी बोलतो सुद्धा, आणि आपण त्याचा स्पर्श अनुभवू शकतो. मला जेव्हा हा अनुभव आला, तेव्हा ना कुठे वीज चमकली, ना सोसाट्याचा वारा सुटला, ना माझ्यासमोर खूप लख्ख प्रकाश पसरला! तरीही, होय मला देव दिसला!

"मनस्वीता" म्हणजे मनस्वीपणा, आपण नेहेमी म्हणतो, मी माझ्या मनासारखे आयुष्य जगणार, पण आपली मनस्वीता ही कधीच नसते, जी असते ती त्या परमेश्वराची! आपल्या आत्म्याची जी मानसिक घडण असते ती त्या परमेश्वराच्या पायी लीन होण्यासाठी धडपडत असते, आणि शरीराने आपण आपल्या आत्म्याला कशी साथ देतो त्यावर आपल्या आध्यात्मिक प्रगतीची रुपरेषा तयार होत असते! आणि जेव्हा जेव्हा परमेश्वराच्या प्राप्तीसाठी या देहाला थोडे कष्ट होतात, तेव्हा तेव्हा हा आत्मा देहाचे आभार मानत असतो. कारण शरीर हे आत्म्याने धारण केलेले वस्त्र आहे, जे तो सतत बदलत असतो, आणि मनुष्य-जन्म हा त्या परमेश्वर प्राप्तीसाठीचा सगळ्यात चांगला मार्ग आहे कारण इतर कठल्याही योनीत परमेश्वर प्राप्तीसाठीची विचारसरणी निर्माणच होत नाही, याचा विचार डोक्यात आला, आणि डोळ्यांत पाणी दाटले. भानावर आलो आणि त्या कानिफनाथांना नमस्कार करुन गुहेच्या बाहेर आलो! खूप शांत वाटत होते, जणू काही या जगण्यातील क्षणभंगुरतेच अंदाज मला आला होता आणि या मनुष्या योनी जन्माला आल्याचे कारण मला उमगले होते.

त्याच प्रसन्न मनस्थिती मधे आम्ही डोंगर उतरून खाली आलो, आणि घराकडे परतलो!

आजही तो प्रसंग मला जसाच्या तसा आठवतो आणि मला परमेश्वराच्या चरणी वारंवार लीन करतो!

हिमांशु डबीर
२०-मार्च-२००९

3 comments:

  1. Dabir Saheb atishay sundar aasa blog lihila aahe adhichehi bolga pan kharacch chaan aahet! bhashecha wapar atishay chan kela aahe! Wegwegle anubhaw pratekalach yet astat pan te shabdat aani kagdawar utrawane kathin aahe! U have done it very wel! Hats of to you!

    ReplyDelete
  2. NABAD raaaje !! vachun parat to anubhav ghetla !!! :)

    ReplyDelete