Sunday, March 22, 2009

एका वाल्याची "नविन" गोष्ट

सध्या देव काय करतोय? कधी प्रश्न पडला का हा तुम्हाला? मला कालच पडला, तसा या प्रश्नाला काही अर्थ नाही, खूप थोर लोक याचे उत्तर एका मिनिटात देतील. हे जग हा परमेश्वर चालवतो, हा वारा त्याच्या आज्ञेने वाहतो, आपण त्याच्याचमुळे जगतो, आपली सगळी कार्ये त्या परमेश्वरच्या प्रेरणेने होत असतात! आपले आयुष्य आपण कसे जगणार आहोत हेसुद्धा त्याने आधीच लिहून ठेवलेले आहे, आपण फक्त ते त्याप्रमाणे जगतो. मग प्रश्न पडतो, की जर माझे आयुष्य या देवाने लिहिले आहे, माझे म्हणजे आपल्यासकट सर्व प्राणीमात्रांचे आयुष्य याने लिहून ठेवलेले आहे. कुठल्या क्षणी कुठे काय होणार याचे गणित त्याने आधीच मांडून आणि सोडवून ठेवलेले आहे. जे काही आपण करतो, ते सगळे आधीच ठरलेले आहे, आपण फक्त त्याची अंमलबजावणी करतो. आपण मी केले म्हणून उगाच मिरवत असतो, पण खरा कर्ता करविता तो बाप्पा आहे. मग मी काय करतो? मोठा विचित्र प्रश्न आहे हा? काहींना तर हे असले प्रश्न, विचार हे नैराश्यवादी वाटतात. पण तो त्यांचा प्रश्न आहे.
माझे सगळे आयुष्य कसे जगणार आहे मी हे जर त्या बाप्पाने आधीच लिहून ठेवलेले आहे, तर मग तो आत्ता काय करतो आहे? कोणी कुठे कुधी कसे जन्मायचे, कसे कधी कुठे मरायचे, आयुष्यात काय काय प्रकारचे कार्य करायचे हे सगळे त्याने आधीच लिहून ठेवले आहे, मग त्याला आता उद्योग काय आहे? हा वारा म्हणजे वायुदेव, आपल्याला दिसले नाहित तरी जाणवतात, हा पाऊस म्हणजे वरूणदेव आपल्याला भिजवतात, पूर निर्माण करतात, हा सूर्य म्हणजे सूर्यदेव आपल्याला रोज दिसतात, आपल्याला प्रकाश देतात, झाडा-पानांना नविन जीवन देतात, हा अग्नि म्हणजे अग्निदेव आपल्या मंगलकार्यात आपल्याबरोबर असतात, आणि आपल्या आयुष्याच्या शेवटी हेच आपली चितेवर सोबत करतात! म्हणजे तात्पर्य काय की हे चार देव त्यांचे अस्तित्व आपल्याला सतत दाखवून देतात, पण मग बाकीचे देव काय करतात? ते ब्रम्हदेव, ते विष्णूदेव, आणि शंकर भगवान आणि या सगळ्यांबरोबर इंद्रदेव, आणि बाकीचे सगळे त्यांचे सहकारी देव देवता हे काय करतात? कारण जर सगळ्यांचे नशीब, आयुष्य जगण्याची शैली हे जर आधीच लिहून ठेवले आहे तर मग ते "मॉनिटर" जरी करायचे तरी काय करणार? आणि "मॉनिटर" करायचे म्हणजे देवाने खुद्द स्वतःच लिहिल्या गोष्टीवर देवानेच अविश्वास दाखवण्यासारखे नाही का? शाळेच्या वर्गात मॉनिटर लागतो तो "मॉनिटरपणा" आणि देवाचा मॉनिटरपणा यात काहीच साम्य नाही, हे तर सगळ्यांनाच माहित आहे. मग हा देव करतो काय? सगळी युगे संपल्यावर एका नविन विश्वाची उत्पत्ती होणार आहे, जसे या पृथ्वीवर आधी डायनॉसोर्सचे राज्य होते त्यांचा नाश झाला, त्यानंतर अनेकविध प्राणी, मग आदिमानव, मग आजचा प्रगत मानव यांची निर्मिती असे चक्र चालत राहीले. डायनॉसोर्सच्या पर्वा नंतर दुसरे पर्व देवाने निर्माण केले, त्या परमेश्वराचे हे सगळे प्रयोग होते, आता माणूस निर्माण झाल्यावर देवाने त्याला हळूहळू बुद्धी दिली, त्याच्याकडून वेगवेगळी कार्ये करवून घेतली, आणि आपल्याला वाटले की आपण नवनविन शोध लावले. पण ते शोध लावणे हे सुद्धा त्या परमेश्वरी इच्छेनुसार घडत होते, मानव केवळ निमित्तमात्र होता, आहे. देवाने मानवाला निर्माण केला, त्याला बुद्धि दिली, आणि भल्या-बु-याची निवड करायची ताकद दिली. बाकी प्राण्यांना नाही दिली. उगाच नाही म्हणत ना "विनाश काले विपरीत बुद्धि". इथे बुद्धिच का म्हटले? काही अजून का नाही वापरले? कारण खरोखर मानवाला विचार करण्याची क्षमता आहे, इतर प्राण्यांमध्ये ही क्षमता एकतर खूप कमी आहे किंवा मुळीच नाही! चांगले किंवा वाईट हे मानव ठरवू शकतो, पण सगळेच जण त्या अंतिम सत्याला बांधले गेलेले आहेत, आणि ते म्हणजे मानव जे काही बरे-वाईट करतो, ते त्याच्या नशिबात लिहिलेले असते म्हणून! म्हणतात ना "कोणी चोर म्हणून जन्माला येत नाही" तो त्याच्या कर्माने चोर अथवा साधू बनतो. त्याच्या कर्मांची प्रेरणा देणारा बाप्पाच असतो. वाल्याचा वाल्मिकी झाला, का झाला? गम्मत म्हणून? नाही, नारदमुनी भेटण्याआधी तो खून मारामा-या आणि दरोडे असले कर्म करतच होता ना? मग त्याचवेळी त्याला नारदमुनींनी दिक्षा दिली आणि त्याच्या कर्मांची दिशा बदलली, आणि पुढे तो वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध झाला. आता या वाल्यालाच का भेटले नारदमुनी, त्यावेळी जगात कोणी दुसरा मनुष्य नव्हता? होते ना, अनेक होते, पण या वाल्याच्या नशिबात देवाने वाल्मिकी बनणे आधीच लिहून ठेवले होते, तर मग दुसराकोणी कसा वाल्मिकी बनला असता बरे?
आता असे पाहा की देवाने या सगळ्या "प्रोसेसेस्" "डिफाईन" करून ठेवल्या आहेत, त्यात कुठलीही गडबड कोणीही करू शकतच नाही, या जगच्या शेवटापर्यंत या "प्रोसेसेस्" अशाच अविरतपणे चालूच राहाणार आहेत. त्यामुळे आता देव निवांत विश्रांती घेत झोपले आहेत. जे काही चांगले आत्मे या पृथ्वीतलावरून मरून परमेश्वराकडे जातात ते सगळे आत्मे आता या विश्वाच्या विनाशानंतर तयार होणा-या नविन विश्वासाठी "रिसर्च" करत आहेत. देवाने त्यांना या कामावर नेमलेले आहे, जिथे त्यांना अडेल तिथे नविन निर्मितीच्यावेळी देव त्यांना मदत करेल, पण तूर्तास तरी तो निवांतपणा अनुभवत आहे.
त्यामुळे या जगात जोवर तुम्ही आहात, तोवर परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा आपल्या अंतरंगात डोकवून पाहा, पाहा कुठे तुम्हाला वाल्या भेटतो का? आणि भेटलाच तर मग त्याचा वाल्मिकी कसा करायचा याचा प्रयत्न करा! तुम्हाला यश येईलच, कारण जेव्हा तुम्हाला असे वाटेल की आपण देवाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, तेव्हा तुम्हाला ती प्रेरणा देणारा दुसरा-तिसरा कोणी नसून साक्षात परमेश्वरच असेल यात शंका नाही.

मला माझ्यातला वाल्या भेटला आहे, पाहू आता त्याला देव कसा वागवतो?

तूर्तास तरी, हे आर्टिकल लिहायला देवाने मला प्रेरणा दिली, त्याबद्दल त्या बाप्पाचे अनेक आभार!


हिमांशु डबीर

२२-मार्च-२००९

6 comments:

  1. तुमचा लेख वाचून वेगाने गोल-गोल फिरणार्‍या पाळण्यात बसून झाल्यावर जसं वाटतं अगदी तसंच डोकं गरगरलं. चांगलं लिहीलय असं मला म्हणायचय!

    ReplyDelete
  2. baap re.....vishay kuthe suru zala ani kuth paryant pochlas....zabardast...kharach bhirbhirlya sarkha zala ahe...deva....valya ani valmiki hya doghanchya shodhat yash yeu de mala..... :)

    ReplyDelete
  3. vishay khupach chan prakare mandla ahe !!! madhe madhe thode vishayantar zale ahe pan je vegle mudde mandale gele ahet te dekhil nirvivad pane rasta ahet !!!!

    ReplyDelete
  4. Tula nakki kay mhanayche ahe te mala kalale nahi

    ReplyDelete
  5. Tula nakki kay mhanayche ahe ?

    ReplyDelete